…मग देशात घोषित आणीबाणी आहे का ?, CM ठाकरे यांचा फडणवीस यांना सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांनी राज्यात अघोषित आणीबाणी असल्याची टीका केली आहे. यावर महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतित्युत्तर दिले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आणखी काही नेते उपस्थित होते.

शेतकरी दिल्लीच्या सीमेवर त्यांच्या न्याय हक्कासाठी ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्याशी नीट बोलणे, त्यांच्या भावना समजून घेणे, या गोष्टी तर सोडाच पण भर थंडीत शेतकऱ्यांना उघड्यावर बसावे लागत आहे. त्यांच्यावर थंडगार पाण्याचे फवारे मारले जात आहेत. हे काही सद्भावनेचे लक्षण नाही. आपल्याच अन्नदात्यावर अन्याय करताना त्याला तुम्ही देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. आंदोलन करणारे शेतकरी हे डावे आहेत, अतिरेकी आहेत, पाकिस्तानी-चिनी आहेत की आणखी कुठून आले आहेत हे भाजपाच्या सर्व नेत्यांनी एकदा ठरवावे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

तसेच कोरोना काळात राज्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला हा आरोप फडणवीस यांनी केला आहे. याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, कोरोना काळात जे काही घडले त्यातून आपण मार्ग काढत आहोत. मात्र विरोधकांनी या सगळ्या काळातही फक्त राजकारण केले. कोरोना काळात राज्य सरकारच्या तिजोरीवर भर पडला आहे. अजूनही केंद्राकडून राज्याचे 28 हजार कोटी येणे बाकी आहे. सरकारने काय -काय कामे केली आहे, हे विरोधकांनी पाहिलेच नसेल. सरकारने मागील वर्षभरात काय कामे केलीत याची पुस्तिका नुकतीच महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली. जनतेत कुठेही सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाही असेही ठाकरे म्हणाले.