मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना ‘ही’ महत्वाची ‘विनंती’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपालांकडे विनंती केली आहे की कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी.

मुख्यमंत्र्यांनी सुचवले की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचे आहे. त्यांचे कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून सर्व भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. म्हणूनच त्यांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करावेत. याआधी अशी एकेरी असलेली नावे जसे की मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या नावात देखील छत्रपती शिवाजी महाराज असा संपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मानस व्यक्त केला की या प्रकारे केवळ शिवाजी महाराज नाही तर राज्यातील सर्व आदरणीय महापुरुष व दैवतांच्या नावाने असणाऱ्या शासकीय योजना, कार्यक्रम व ठिकाणे यात नामविस्तार करुन त्यांच्या नाम उल्लेख संपूर्ण करावा. उदाहरणार्थी फक्त ज्योतिबा फुले असे न म्हणता महात्मा ज्योतिराव फुले, तसेच संभाजी न म्हणता छत्रपती संभाजी महाराज असा नामविस्तार करुन या महापुरुषांचा योग्य तो गौरव करावा या दृष्टीने संबंधित विभागांनी कार्यवाही सुरु करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर उद्धव ठाकरे यांनी आरे आंदोलन, नाणार प्रकल्प आंदोलनकर्ते यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता मराठा आंदोलन आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी केली होती.

खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी दोन मागण्या करत ट्विट केले की मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेणे आणि कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठासहित महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे करणे. याशिवाय यांनी या संबंधित पत्र मुख्यमंत्र्यांनी देखील लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

आजकालच्या आचार आणि विचारशून्य राजकरण्यांनी महाराजांचे नाव राजकारणात वापरु नये अशीही सर्व शिवभक्तांची भावना आहे. त्यामुळे रवी शंकर प्रसाद यांनी तात्काळ आणि बिनशर्त माफी मागावी अशी मागणी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी केली होती.

Visit : Policenama.com