CM ठाकरेंच्या ‘या’ निर्णयाने जिंकली मने, चर्चा तर होणारच !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाण पुलावरून वाहतूक सुरु करुन वाहनधारकांची गैरसोय टाळावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएमआरडीएला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशाने मुंबई-नाशिक महामार्गावर धावणाऱ्या वाहनांची कोंडीतून सुटका होणार आहे. या महामार्गावरील माणकोली येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होते. मात्र भिवंडी इमारत दुर्घटनेमुळे हा लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आला.

मुंबई-नाशिक महामार्गावर माणकोली येथील उड्डाणपुलाच्या ठाणे दिशेकडील डाव्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच इतर लोकप्रतिनिधी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम ठरला होता. त्याप्रमाणे एमएमआरडीएने आवश्यक ती तयारी केली होती. मात्र, पहाटे भिवंडी येथे इमारत दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी भिवंडी येथे धाव घेतली व मदतकार्य वेगाने सुरु झाले. त्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकंदर स्थिती लक्षात घेऊन तातडीने पुढील निर्देश एमएमआरडीएला दिले. केवळ अधिकृत उद्घाटन झाले नाही म्हणून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवणे आणि वाहनधारकांची गैरसोय करणे बरोबर नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला उद्घाटनाची वाट न पाहता पुलाची मार्गिका खुली करुन वाहतूक सुरु करण्यास सांगितले. या निर्णयामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता माणकोली येथे उड्डाणपूल बांधण्यात आला.ही बाब लक्षात घेऊन या उड्डाणपुलाची वाहतुकीसाठी सज्ज झालेली मार्गिका तातडीने खुली करण्यास मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य दिले. उद्घाटन सोहळ्याला बगल देत त्यांनी हे पाऊल उचलले. या निर्णयाचे भिवंडी, ठाणेकर तसेच या मार्गावरुन मुंबई-नाशिक असा प्रवास करणाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.