Lockdown : कल्याणमध्ये अडकलेल्या झारखंडमधील 28 कामगारांची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आल्यामुळे बहुतांश राज्यात कामगार अडकून पडले आहेत. लॉकडाउनमुळे कल्याणमध्ये झारखंडमधले 28 कामगार अडकले आहेत. त्यासंदर्भात शहाबुद्दीन अन्सारी यांनी ट्विट केले होते. ट्विटला उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांना मी यासंदर्भातली कल्पना दिली आहे. ते लवकरच तुम्हाला संपर्क करतील आणि योग्य ती मदत करतील असे आश्वासन ठाकरे यांनी दिले आहे.

झारखंड येथील 28 कामगार महाराष्ट्रातील कल्याणमध्ये अडकून पडले आहेत. उल्हासनगर आणि कल्याण येथील भागात हे कामगार अडकले आहेत. ते सर्व गोड्डा येथील रहिवासी आहेत. या सगळ्यांकडे खाण्या पिण्यासाठीही पैसे नाहीत. राहण्यासाठी निवाराही नाही. त्यामुळे या लोकांना मदत करा असे आवाहन शहाबुद्दीन अन्सारी यांनी ट्विट करुन केले होते. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच या सगळ्यांना मदत केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी आणि लॉकडाउनमुळेच हे कामगार अडकले आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.