सरपंच, नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून नाही ? BJP च्या निर्णयाला ‘महाविकास’चा दे धक्का

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यापासून जुन्या सरकारचे मेट्रो, बुलेट ट्रेन यासारखे अनेक प्रकल्प स्थगित करण्यात आले आहे. यानंतर आता या ठाकरे सरकार फडणवीसांच्या आणखी एका निर्णयाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. जनतेमधून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याची पद्धत फडणवीस सरकारने सुरू केली होती. या संदर्भातील विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आले असून ते मंजूर होण्याची दाट शक्यता आहे.

फडणवीस सरकारने अडीच वर्षांपूर्वी जनतेमधून सरपंच, नगराध्यक्षांची निवड आणि नगरपालिकांमध्ये चार प्रभागांची पद्धत हे दोन्ही निर्णय घेतले होते. मात्र आता उद्धव ठाकरे सरकार हे दोन्ही निर्णय बदलण्याच्या तयारीत आहे. अनेक नगरपालिकांमध्ये सत्ता एका पक्षाची, मात्र नगराध्यक्ष दुसऱ्याच पक्षाचा अशी अवस्था आहे. त्यामुळे सत्ता राबवताना गोंधळ होतो. याच कारणामुळे हे दोन्ही निर्णय रद्द केले जाणार असल्याचं समजतं.

दरम्यान, पूर्वी ग्रामपंचायत सदस्य सरपंचाची निवड करायचे. तर नगरसेवकांकडून नगराध्यक्षांची निवड केली जायची. मात्र ही पद्धत बंद करत थेट जनतेमधून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडायचा हि पद्धत फडणवीस सरकारने सुरू केली होती. मात्र आता ही पद्धत राज्याच्या नव्या सरकारकडून बंद केली जाणार आहे. त्याचबरोबर मुंबई वगळता सर्व महापालिका आणि नगरपालिकांमधील चार प्रभागांची पद्धतदेखील रद्द केली जाणार असून पहिल्यासारखी एक प्रभाग एक पद्धत लागू करण्याच्या दृष्टीनं कामकाज सुरु आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/