जाऊ द्या हो, त्यांच ज्ञान अगाध, म्हणून त्यांना सर्व गुपित कळतात

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीवरुन भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांनीही आग लागली की लावली असा सवाल उपस्थित केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता, विरोधकांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट हातच जोडले. जाऊ द्या हो! त्यांच ज्ञान अगाध आहे. म्हणून त्यांना सगळी गुपित कळतात. सर्जिकल स्ट्राइक कधी होणार हेही त्यांना माहित होत, अशा लोकांनी खरंतर आमच्या ज्ञानात भर घालायला हवी. त्यांना आधीच माहिती मिळत असेल तर आम्हाला सांगायला हवी असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आगीत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती देतानाच विरोधकांनी केलेल्या आरोपांवर देखील शरसंधान केल आहे. आगीत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. कोरोनाची लसही सुरक्षित असून जिथे बीजीसी लस तयार केली जाते तिथ ही आग लागली आहे. आगीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळू द्यात मग सगळी माहिती समोर येईल. त्याआधीच तर्कवितर्क लावणे योग्य नाही. विद्युत बिघाडामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आग विझविण्याचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. मी स्वत: तेथील माहिती जाणून घेत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सीरमच्या आगीमागे घातपात असल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. सीरमला लागलेली आग विझण्याआधीच आगीवरुन राजकारण करणाऱ्यांना खरंतर संयमाची लस टोचण्याची गरज आहे. आग पूर्णपणे विझू द्या. अग्निशमन दलाच्या जवानांना त्यांच काम करू द्या, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.