ई-भूमीपूजनावरून विश्व हिंदू परिषदेची CM ठाकरेंवर जहरी टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राम मंदिर उभारणी न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर राम मंदिराच्या उभारणीच्या तयारीला वेग आला. येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये भूमीपूजन होणार आहे. राम मंदिराच्या भूमीपूजनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-भूमीपजून करण्याचा सल्ला दिला होता. यावर विश्व हिंदू परिषदेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राम मंदिराचं भूमीपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्हावं असं उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. आता विश्व हिंदू परिषदेने अधिकृतपणे पत्रक काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांचे विधान ऐकून आश्चर्य वाटले, फक्त अंध विरोधाच्या भावनेतून त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय सूचवला आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी प्रखर हिंदुत्त्ववादी राजकारणाची भूमिका घेतली त्यांच्या शिवसेनेचं अध:पतन कसं झालं ? अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्याक्ष अलोक कुमार म्हणाले, भूमिपूजन मंदिर नर्माणाआधी आवश्यक आणि पवित्र काम असतं, यात भूमीची खुदाई करून पृथ्वी मातेचे पूजन केले जाते. त्याचा आशिर्वाद मागितला जातो, हे काम दिल्लीत बसून व्हिडीओ कॉन्फन्सद्वारे होऊ शकत नाही. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत देशातील जनता पुढील जीवन जगत आहे. थोड्या काळासाठी सुप्रीम कोर्टानेही जगन्नाथ रथ यात्रा काढण्याची परवानगी दिली होती. अमरनाथ यात्रा स्थगित झाल्यानंतरही यात्रेचे धार्मिक परंपरेनुसार विधीवत पूजा करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.