‘सरकार पडणार नाही याची शाश्वती देतो, अधिवेशनाला उपस्थित रहा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाला दांडी न मारता हजर रहावे, अशी सूचना महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना देण्यात आली आहे. अधिवेशन काळात दररोज सभागृहात हजर राहण्याची सूचना वजा तंबी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना अधिवेशनाला दांडी न मारता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

कोणी काहीही म्हणो हे सरकार पडणार नाही याची शाश्वती मी देतो, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांना टोला लगावला आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे कौतुक केले आहे. सोनिया गांधी चांगल्या विचारांच्या आहेत. सरकारला अडचण निर्माण होईल, असे कोणीही वक्तव्य करू नये, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी आघाडीतील सर्व आमदारांना दिली आहे.

सरकार 11 दिवसात कोसळणार

राज्यामध्ये तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार 11 दिवसात कोसळेल असे भाकीत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी वर्तवलं आहे. भिवंडीमधील एका कार्याक्रमात बोलताना नारायण राणे यांनी हे भाकीत केले आहे. त्यांच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.