‘कोरोनाची परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतरच प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होतील’ : उदय सामंत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीत महाविद्यालयाकडून शिकवला जाणारा ऑनलाईन अभ्यासक्रम ग्राह्य धरला जाणार असून त्याआधारेच परीक्ष घेतल्या जातील. मात्र, कोरोना परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतरच प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होतील असं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी स्पष्ट केलं.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन परीक्षांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ महेश काकडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले, “पुणे विद्यापीठातर्फे सुमारे 2 लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीनं तर 50 हजार विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठानं परीक्षेसाठी आवश्यक असलेली सर्व तयारी केली आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील परीक्षा सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन व विद्यापीठ प्रशासन यांच्यातील समन्वयासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विद्यापीठात घेण्यात आलेल्या बैठकीत तीनही जिल्ह्यातील प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील प्राध्यापकांची व तासिका तत्वावरील (सीएचबी) पदांची भरती लवकरच केली जाईल. तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या भरतीसाठी नेट-सेट पात्रताधारक उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर इतर उमेदवारांचा विचार केला जाईल असंही सामंत म्हणाले.

कोरोनामुळं पुणे विद्यापीठानं शुल्कवाढ मागे घेतली आहे. त्यामुळं एकाही संलग्न महाविद्यालयानं शुल्कवाढ करू नये. जिमखाना शुल्क, डेव्हलपमेंट शुल्क, आदी प्रकारचे शुक्ल महाविद्यालयांना आकारता येणार नाही. केवळ शैक्षणिक शुल्क आकारता येईल. विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क आकारणी करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कारवाई केली जाईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.