कॉमिडिअन कुणाल कामराची PM मोदींवर टीका, म्हणाले – ‘पुढीलवेळी अर्णबच्या आधी रविश कुमारांना मुलाखत द्या’
नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी परीक्षा पे चर्चा-2021 या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदीनी विद्यार्थ्यांना कठीण प्रश्नाला आधी सामोरे जावे, असा सल्ला दिला. यावरून प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने पंतप्रधान मोदींचे नाव न घेता टीका केली आहे. यावर, असे असेल तर पुढीलवेळी अर्णब गोस्वामीला मुलाखत देण्याऐवजी रविश कुमार यांना मुलाखत देण्याचा प्रयत्न करुन बघावा, असे खोचक ट्विट कामराने केले आहे. कामराने यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.
So next time Arnab ko interview dene se pahle Ravish ko dene ka attempt karna… pic.twitter.com/cS2C3nCxpX
— Kunal Kamra (@kunalkamra88) April 8, 2021
परीक्षा पे चर्चा 2021 हा कार्यक्रम पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालयाच्या सर्व समाजमाध्यमांवर थेट प्रसारित केला होता. कार्यक्रमासाठी 13 लाखांहून अधिक शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी नोंदणी केली होती. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, जे आवडते ते आपण आधी करतो, विद्यार्थी सहज, सोप्या आणि त्यांना आवडणाऱ्या विषयाचा जास्त अभ्यास करतात आणि कठीण विषयाला घाबरतात. उलट कठीण गोष्टींना आधी सामोरे जा. परीक्षेत असे म्हटले जाते की सोपे आधी सोडवा, पण मी तर म्हणेन जे कठीण आहे त्याचा निपटारा सर्वात आधी करायला हवा, असे मोदी म्हणाले होते.
यावर कामराने निशाणा साधला आहे. ट्विटसह कामराने कठीण प्रश्न पहिले सोडवावे’ हा मोदींनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्लाचा फोटो पोस्ट केला आहे. पंतप्रधान झाल्यापासून आतापर्यंत मोदींनी ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांना एकही मुलाखत दिलेली नाही, कुमार यांनी मध्यंतरी मुलाखतीचे आवाहन दिले होते. मात्र, अद्याप मोदींनी मुलाखत दिली नाही. त्यामुळे रविश कुमार यांना मुलाखत देण्याचा प्रयत्न करावा, असे कामराने म्हटले आहे.