दिवाळीपूर्वीच मिळणार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, दिवाळी गोड होणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानपरिषद निवडणूक आचारसंहितेमुळे शेतक ऱ्यांना मदत देण्यात अडथळा येऊ नये यासाठी राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. याबाबत लवकरच परवानगी मिळेल. त्यामुळे पुढील आठवड्यापासून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे पैसे मिळायला सुरूवात होईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. यापूर्वीही निवडणूक आचारसंहितेच्या काळात शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या रक्कमेचे वाटप करण्यात कोणताही अडथळा येणार नाही, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.राज्यातील मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप करून मंदिरांबाबत दिवाळीनंतरच निर्णय होईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.