विरोध सहन करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या : शिक्षणमंत्री डाॅ. रमेश पाेखरियाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विरोध सहन करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरता अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात आल्या. त्यात विद्यार्थीही आनंदाने सहभागी झाले, असे मत केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी मांडले. ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सव वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बुधवारी बोलत होते.

डॉ. पोखरियाल म्हणाले, विरोध सहन करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठीच अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या. त्यात विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले. त्यासाठी वेळापत्रक बदलून परीक्षा घेण्यात आल्या. जेईई आणि नीट परीक्षांचेसुद्धा आयोजन करण्यात आले होते. त्यादेखील यशस्वीरित्या पार पडल्या. योग्यवेळी निर्णय घेतल्याने हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितलं.

नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात बोलताना त्यांनी म्हटलं, देशातील विद्यार्थी, पालक आणि समाजातील सर्व घटकांचा विचार करून शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यास रिपोर्ट कार्ड नाहीतर प्रोग्रेस कार्ड देण्यात येईल. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून शिकता येईल, अशी व्यवस्था या धोरणाद्वारे निर्माण केली जाणार आहे.

दरम्यान, यावेळी सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, उपाध्यक्ष यशवंत वाघमारे, नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, अभय क्षीरसागर, सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी सूत्रसंचालन, तर सहस्रबुद्धे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.