टाटा आणि मिस्री यांच्यात मुल्यांकनावरून संघर्ष, वाद होण्याची चिन्हे, 13 अब्ज डॉलरची तफावत

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक प्रतिष्ठा लाभलेला टाटा उद्योगसमूह (Tata Sons) आणि अब्जाधीश पालनजी मिस्री (Pallonji Mistry) यांच्या नेतृत्वाखालील शापूरजी पालनजी (एसपी) समूह यांच्यात आता टाटा सन्सच्या समभागांच्या मूल्यांकनावरून कलह होण्याची चिन्हे आहेत. हा भारतीय औद्योगिक इतिहासातील सर्वांत मोठा विवाद ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्ही समुहातील मूल्यांकनाची तफावत मोठ्या प्रमाणावर असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी दोन्ही समुहांना दीर्घ वाटाघाटी आवश्यक असल्याचे इनगव्हर्न रिसर्च सर्व्हिसेसचे संस्थापक श्रीराम सुब्रमण्यन यांनी म्हटले आहे.

टाटा उद्योग समूहातील मिस्री यांच्या हिस्सेदारीच्या मूल्यांकनात दोघांनी वेगवेगळे केले असून त्यात तब्बल 13 अब्ज डॉलरची तफावत येत आहे. टाटा सन्समध्ये मिस्त्री समूहाची 18.4 टक्के हिस्सेदारी असून, तिचे मूल्य 80 हजार कोटी रुपये (10.9 अब्ज डॉलर) आहे, असे टाटांचे वकील हरीश साळवे यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. टाटा सन्समधील हिस्सेदारीच्या बदल्यात टाटा समूहातील सूचिबद्ध कंपन्यांतील 24 अब्ज डॉलरची हिस्सेदारी स्वीकारण्याचे शापूरजी पालनजी समूहाने मान्य केले आहे, असेही साळवे यांनी सांगितले.

हिस्सेदारीची अदलाबदली करताना समभागांच्या मूल्यांकनावरून दोन्ही समूहात संघर्ष होणे अटळ असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. टाटांनी काढलेली समभागांची किंमत एसपी समूह मान्य करणार नाही, असे जाणकारांनी सांगितले. एसपी समूहास सध्या पैशांची गरज असल्याचेही सूत्रांनी सांगितले.एसपी समूह आणि टाटा समूह यांच्यातील संघर्षास 2016 मध्ये सुरुवात झाली होती.