केंद्र सरकार विरोधात मोर्चा : पोलिसांनी पकडली राजू शेट्टीची ‘कॉलर’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन –   दिल्ली येथील शेतक-यांवर अत्याचार करणा-या केंद्र सरकारच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि. 1) कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी पंतप्रधान मोदी यांचा पुतळा जाळतांना पोलीस आणि कार्यकर्यांची जोरदार झटापट झाली. यात माजी खासदार राजू शेट्टी (Former MP Raju Shetty) यांची कॉलरही पोलिसांनी पकडल्याने कार्यकर्ते पोलीसांच्या विरोधात आक्रमक झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हे अदानी आणि अंबानी यांचे हस्तक असून हे सरकार त्यांच्यासाठीच काम करत आहे. शेतक-यांचा बळी जात असताना मात्र सरकार त्यांच्यावर अन्याय करत आहे. दोन दिवसात सरकारने शेतकरी विधेयकाबाबत निर्णय न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी खासदार शेट्टी यांनी दिला आहे.दरम्यान हे आंदोलन सुरु असतानाच कार्यकर्त्यांनी मोटारीतून पंतप्रधान मोदीं यांचा प्रतीकात्मक पुतळा आणला होता. हा पुतळा पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी कार्यकर्त्यांकडून हा पुतळा हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्ते खवळून उठले अन् पोलिसांच्या अंगावर धावून गेले. यात पोलीस आणि कार्यकर्त्यात झटापट झाली.