‘नागरिकत्व’ विधेयकास पाठिंबा दिल्यानं शिवसेनेवर काँग्रेसची नाराजी, ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं

नवी दिल्ली – वृत्त संस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ सादर केले. यावेळी लोकसभेत एकच गोंधळ सुरु झाला. तरीही विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० सदस्यांनी मतदान केले. सोमवारी उशिरा लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले. शिवसेनेच्या खासदारांनीही यावेळी मोदी सरकारला साथ देत विधेयकाच्या बाजूने मतदान केले. मात्र शिवसेनेच्या या भूमिकेवर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. कारण, शिवसेना विधेयकाच्या मंजूरीसाठी मतदान करणार नाही असं सांगण्यात आलं असताना. मग विधेयकाच्या बाजूने मतदान का केलं? असा सवाल काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी उपस्थित केला आहे.

‘नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शिवसेना तटस्थ भूमिका घेऊ शकली असती. परंतु, शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले, हे योग्य नाही असे म्हणत हुसेन दलवाईंनी नाराजी व्यक्त केली. भाजपा राज्यघटना मानत नाही, हे विधेयक संविधानाला धरुन नाही. समाजात फूट पाडण्यासाठी हे विधेयक आणलं गेलं आहे. देशासमोर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत, मात्र या मुद्दयांवर मार्ग काढण्यापेक्षा भाजप समाजात तेढ निर्माण करत असल्याचे आरोप हुसेन दलवाईंनी केला आहे.

दरम्यान, ‘राष्ट्रहिताच्या दृष्टीने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेना खासदारांनी पाठिंबा दिला आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाराष्ट्रात लागू आहे. जनहितासाठी राज्यात सत्तांतर झालं आहे. जनतेच्या विकासासाठी हा कार्यक्रम हाती घेतला आहे, असे मत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात बोलताना व्यक्त केले.

तसेच, शिवसेनेच्या मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातूनही या विधेयकाविरोधात भाष्य करण्यात आलं होत.’ घुसखोरांना हाकलायलाच हवे, पण त्या बदल्यात इतर धर्मीय- त्यांत हिंदू बांधव आहेत- त्यांना स्वीकारण्याचे राजकारण देशात धर्मयुद्धाची नवी ठिणगी तर टाकणार नाही ना? हिंदूंना जगाच्या पाठीवर हिंदुस्थानशिवाय दुसरा देश नाही हे मान्य, पण नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने ‘व्होट बँके’चे नवे राजकारण यातून कोणी घडवू पाहत असेल तर ते देशाच्या हिताचे नाही अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने टीका देखील केली होती.

Visit : Policenama.com