ढासळली अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या, तरी पंतप्रधानांना झोप कशी लागू शकते ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. तसेच बेरोजगारीचाही प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या बद्दल पुन्हा एकदा विरोधकांनी केंद्रातील नरेेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ’देशात प्रत्येक दिवसाला 38 बेरोजगार आणि 116 शेतकरी आत्महत्या करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झोप तरी कशी लागू शकते?’ असा सवाल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरलं आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या म्हणण्यानुसार, मागील 73 वर्षांत पहिल्यांदा अर्थव्यवस्था आणि व्यक्ती या दोघांचेही कंबरडं मोडण्यात आलं आहे. आर्थिक उद्ध्वस्तता आणि आर्थिक आणीबाणीकडे देशाला ढकलला जातोय. कोसळणारा जीडीपीचा ढळढळीत पुरावा आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि टाळेबंदी ’मास्टरस्ट्रोक’ नाही तर ’डिझास्टर स्ट्रोक’ ठरले आहेत.

मागील सहा वर्षांपासून ’अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड’च्या माध्यमातून अर्थव्यवस्था हाकणारे आता ’अ‍ॅक्ट ऑफ गॉड’च्या नावावर खपवत आहेत. जीडीपीची घसरण सामान्यांच्या जीवावर उठली आहे. लोकांचा आणि बँकांचा सरकारवरून तसेच सरकारचा आरबीआयवरून विश्वास नष्ट झाला आहे, असेही काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हंटले आहे.

ढासळत्या अर्थव्यवस्थेदरम्यान केंद्राने जीएसटीमध्ये राज्यांचा वाटा देण्यास नकार दिाला आहे. जर राज्यांचा पैसा केंद्राने गडप केला केला तर देश कसा चालणार? असा देखील प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी विचारला आहे.

सुमारे 80 लाख लोकांनी आपल्या पीएफ खात्यातून सुमारे 30 हजार कोटी रुपये काढले आहेत. सुमारे 6 कोटी 30 लाख लघु-मध्यम उद्योगधंद्यांपैकी अनेक बंदीच्या उंबरठ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र करोना विषाणू, चीन, अर्थव्यवस्था, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या या प्रश्नांपासून बचावाच्या प्रयत्नात आहेत. पण, आम्ही संसदेत आणि संसदेच्या बाहेरही आपले म्हणणं मांडत राहू, असेही काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हंटले आहे.