Video : मोदी-शहांसमोर निवडणूक आयोग झुकलाय : काँग्रेसचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मंगळवारी भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर आता निवडणूक आयोगाने यावर कडक भूमिका घेत प्रचार २० तास अगोदरच थांबवण्याचा निर्णय घेतला. यावर काँग्रेसने विरोध करत आज पत्रकात परिषद घेत आपली भूमिका मांडली. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर टीका केली आहे. निवडणूक आयोग हा निर्णय घेऊन भाजपला मदत करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

मंगळवारी झालेल्या राड्यानंतर निवडणूक आयोगाने कठोर पाऊल उचलत प्रचाराचा काळ कमी केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी बंद होणारा प्रचार आता गुरुवारी रात्री १० वाजताच बंद करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदींच्या आजच्या सभांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला.

यामुळे लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. आचारसंहिता भंगाचे सबळ पुरावे देऊन देखील निवडणूक आयोग कारवाई करत नसल्याचे पुन्हा एकदा सुरजेवाला यांनी सांगितले. दरम्यान, कोलकात्यात झालेल्या हिंसाचारात ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप देखील यावेळी सुरजेवाला यांनी केला.