भाजप नेत्यांनी आग लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे, काँग्रेसचे टीकास्त्र

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याचिकांवर सध्या तीन सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी सुरू असून, न्यायालयाने 1 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वादविवाद सुरू झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुनावणीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. त्या पत्रावरून काँग्रेसने भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात सहाय्य करण्यात राज्य सरकारचे अधिकारी कमी पडत आहेत. या प्रकरणी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. या मागणीवरून काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी विपर्यास करून आग लावण्याचा कार्यक्रम भाजपा नेत्यांनी हाती घेतला आहे.

संघाशी संबंधित जे विधिज्ञ दिल्लीत पूर्वी राज्य सरकारचे काम पाहत होते व आता दूर करण्यात आले आहेत. ते पत्रकारांना फोन करुन चुकीची माहिती देत आहेत, याची दखल सरकारने घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकालात मुकुल रोहतगी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर व्हर्च्युअल सुनावणीतील अडचणी सांगून प्रत्यक्ष सुनावणीचा आग्रह धरत आहेत, असे म्हटले आहे.

याची जाणीव त्यांना आहे. न्यायालयाने पुढे इतर वकिलांनी देखील प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची विनंती केली असे म्हटले आहे. वकिलीचे शिक्षण घेतलेल्या फडणवीस यांना माहित नाही असे नाही. एके ठिकाणी प्रत्यक्ष सुनावणी झाली पाहिजे, असे म्हणायचे व स्वतःच नियुक्त केलेल्या वकिलांच्या वक्तव्यावर आक्षेप घ्यायचा हा दुटप्पीपणा आहे. यांना आरक्षणाशी घेणंदेणं नाही तर केवळ राजकारण करायचे आहे, अशी टीका सावंत यांनी केली आहे.