‘अण्णा हजारे अविश्वासू व्यक्तीमत्व, ते मॅनेज होतात’, ‘या’ नेत्याचा गंभीर आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषणाचे हत्यार उपसणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उच्चाधिकार समिती नियुक्ती करण्याचे लेखी आश्वासन घेऊन आपले उपोषण स्थगित केले. अण्णा हजारे यांच्या या निर्णयावर काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्व असल्याचे सांगत अण्णा म्हणजे महात्मा गांधी नव्हेत, असे डॉ. मुणगेकर यांनी म्हटले आहे. तसेच अण्णांचे बोलविते धनी आता समोर आले असून अण्णा अनरिलायबल (विश्वास न ठेवण्याजोगे) आणि मॅनेजेबल असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर बोलत होते. यावेळी त्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सरकारवर घणाघाती टीका केली.

डॉ. मुणगेकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नियुक्ती करण्याचे लेखी आश्वासन घेऊन अण्णा हजारे यांनी आपले उपोषण स्थगित केले. आपल्या पूर्वी केलेल्या आणि अजूनही प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी हजारे यांनी 30 जानेवारी पासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, त्याच्या एक दिवस आधीच केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे तोडगा निघाला. त्यामुळे हे उपोषण अण्णांनी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यावर काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी टीका करताना म्हणाले, अण्णा हे हास्यास्पद व्यक्तीमत्व असून अण्णा हे अविश्वासू प्रकारचे व्यक्तीमत्व असून ते मॅनेज होतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

केंद्र सरकारवर टीका
नोटबंदीपासून देशात भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण सुरु झाली. या घसरणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा थेट आरोप डॉ. मुणगेकर यांनी अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला केला आहे. घोषणांच्या बळावर जगलेले भारताच्या इतिहासातील एकमेव सरकार असल्याचे डॉ. मुणगेकर यांनी म्हटले आहे.