‘घरगुती कामासाठी सरकारला प्रश्न विचारत नाही’, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून पृथ्वीराज चव्हाणांचं प्रत्युत्तर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : चीनच्या प्रश्नावर राजकारण करु नये, हे खरं आहे. मात्र, विरोधी पक्षाला प्रश्न विचारण्याचा पूर्ण हक्क आणि अधिकार आहे. म्हणून काँग्रेस प्रश्न विचारणारच. तसेच आम्ही घरगुती कामासाठी सरकारला प्रश्न विचारत नाही. जनतेचा आवाज म्हणूनच केंद्र सरकारला प्रश्न विचारत आहोत, असे सांगत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यात असलेला संघर्ष, हे केंद्रीय संरक्षणमंत्र्याचं अपयश आहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे निसंदिग्धपणे सांगून राष्ट्राच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करु नये, असं मत व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवरती चव्हाण यांनी आज बोलताना पवारांवर टीका केली आहे. साताऱ्यात काँग्रेसचे पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस कमिटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या भारत-चीन प्रश्नी राजकारण न करण्याच्या मुद्दावरुन काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले होते शरद पवार ?
चीनने १९६२ नंतर भारताचा ३६ हजार किलोमीटरचा भूभाग ताब्यात घेतला, हे सत्य आहे आणि याकडे पूर्वीच दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसते. गलवान परिसरात भारत रस्ता बनवतोय. सियाचीन भागातील दळण-वळणासाठी हा रस्ता महत्वाचा आहे. या रस्त्यावर चीनचे सैन्य घुसखोरी करत आहे. अशा घटना सतत घडतात, पण १९९३ मध्ये मी संरक्षणमंत्री असताना या परिसरात दोन्ही सैन्यांनी शस्त्राचा वापर करायचा नाही, असा करार केला होता. सध्याच्या स्थितीत सुद्धा दोन्ही देशांच्या सैन्याकडून कोठेही शस्त्रसंधीच उल्लंघन झालेलं नाही. हाणामारीचे प्रकार घडले, असे म्हणत शरद पवार यांनी यावरुन कोणी सरकारला लक्ष करु नये, असं म्हटलं होत.