शरद पवारांना ‘नाचता येईना अंगण वाकडे’ : अर्थ व नियोजन मंत्री

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी इव्हीएमबाबत आक्षेप घेतल्यामुळे राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांवर जोरदार टीका केली आहे. ‘नाचता येईना अंगण वाकडे’, ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे. निवडणूक जिंकता आली नाही म्हणून शरद पवार इव्हीएमवर दोष ढकलत आहेत. मुनगंटीवार हे खरीप हंगाम आढावा बैठकीच्या निमित्ताने वर्धा येथे आले होते. यावेळी त्यांनी हे विधान केले.

शरद पवार यांच्यवर टीका करताना मुनगंटीवार म्हणाले की , ‘धूल थी चेहरे पे और आईना साफ करते रहे’, असं साधारणतः पवारांचं राजकारण सुरू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ४७ वर्ष दोन महिने १ दिवस सत्ता भोगली. तर ५२ वर्ष केंद्राची सत्ता भोगली. मात्र, निवडणुकांमध्ये पराभव होताच ईव्हीएमला दोष दिला जात आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात जास्त सत्ता भोगणाऱ्यांना आपण सर्व प्रश्न सोडविले असा दावाच सध्या करता येत नाही. त्यामुळे ते इव्हीएम मशिन वर शंका उपस्थित करत आहेत.’

शरद पवार यांचा आक्षेप –

लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा आढावा घेण्यासाठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी पुन्हा एकदा इव्हीएम मशिन वर शंका उपस्थित केली. भाजपने लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.

मात्र, या विजयानंतर देशातील वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, देशाचा ढासळणारी आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टींचा फटका भाजपला निवडणुकीत बसला नाही. हा मुद्दा उपस्थित करत शरद पवार यांनी पुन्हा एकदा इव्हीएम मशिन बाबत जनतेच्या मनात शंका असल्याचं सांगत इव्हीएमवर भाष्य केलं आहे.