आघाडीची तडजोड ; उस्मानाबाद काँग्रेसला तर औरंगाबाद राष्ट्रवादीला !

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन समीकरणे समोर येऊ लागली आहेत. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या जागांमध्ये लढतीत संभ्रम असल्याने त्या जगांची अदलाबदली करण्याच्या वाटाघाटी सध्या काँग्रेस आघाडीमध्ये सुरु आहेत. राष्ट्रवादीकडे असणारी उस्मानाबादची जागा काँग्रेसला द्यायची आणि काँग्रेसकडे असणारी औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला द्यायची अशा तडजोडीवर सध्या आघाडीत चर्चा सुरु आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेस आघाडीत जागा बदलावर एकमत झाले तर उस्मानाबाद मतदारसंघातून काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले जाण्याची शक्यता आहे. तर औरंगाबादमधून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली जाऊ शकते.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्याठिकाणी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे चार वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. आघाडीत हि जागा काँग्रेसकडे आहे. ती जागा राष्ट्रवादीला दिल्यास या मतदारसंघात निश्चित परिवर्तन होऊ शकते अशी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे हि वाटाघाट होण्याची शक्यता अधिक आहे. त्याच प्रमाणे राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण हे औरंगाबादच्या जागेवर लढण्यास इच्छुक आहेत तशी त्यांनी तयारी देखील सुरु केली आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ २००९ साली मतदारसंघ फेररचनेत खुल्या प्रवर्गासाठी निर्धारित करण्यात आला. त्या आधी तो अनुसूचित जातीसाठी राखीव होता. खुला होताच २००९ साली त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडणुकीला उभा राहिले त्यांना शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांनी चांगलीच लढत दिली. या निवडणुकीला पद्मसिंह पाटील विजयी झाले. मात्र २०१४ च्या निवडणुकीला जनतेने पद्मसिंह पाटील यांचा पराभव घडवून आणला. त्यावेळी शिवसेनेचे रवींद्र गायकवाड २ लाखाहून अधिक मताधिक्य घेऊन लोकसभेत गेले. आता शिवसेनेकडून पुन्हा रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादीकडे या ठिकाणी उमेदवारच नाही अशी अवस्था आहे. म्हणूनच हा मतदारसंघ काँग्रेसकडे देण्याचा राष्ट्रवादीने घाट घातला आहे.