देशभक्ती अन् राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे पितळ उघडे पडलेय, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे आता पितळ उघडे पडल्याची जोरदार टीका गांधी यांनी यावेळी केली आहे.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीदरम्यान सोनिया गांधी यांनी या प्रकरणावर भाष्य केले. सोनिया गांधी म्हणाल्या की, देशाच्या सुरक्षेविषयी तडजोड करण्यात आली आहे. जी लोक देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र वाटत फिरत होती. त्यांचे पितळ आता उघडे पडले आहे, असे त्या म्हणाल्या.

संसदेचे अधिवेशन एका आठवड्यानंतर सुरु होणार आहे. आगामी अधिवेशन अर्थसंकल्पीय असले, तरी जनहिताच्या मुद्द्यांवरही चर्चा होणे गरजेचे आहे. केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते, ते पहावे लागेल, असे त्या म्हणाल्या. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारने चर्चेच्या नावाखाली असंवेदनशीलता आणि अहंकार दाखवला आहे, असा आरोप करत कृषी कायदे आणण्यात केंद्र सरकारने घाई केल्याचेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.