लढायचं की घाबरायचं ? काय ते ठरवा, उद्धव ठाकरेंचा सोनिया गांधींना थेट सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्याशी आज संवाद साधला. सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी लाढायचं की त्यांना घाबरून रहायचं हे आधी ठरवलं पाहिजे, असा थेट सवाल केला. या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या.

मी लढणाऱ्या बापाचा मुलगा

या बैठकीमध्ये जीएसटी, जेईई-नीट परीक्षा, देशाची आणि राज्यांची आर्थिक स्थितीसह लॉकडाऊनच्या मुद्यांवरही चर्चा झाली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. उद्धवजी तुम्ही कोरोना संसर्गाशी खूपच चांगल्या पद्धतीने लढत आहात, असे ममता बॅनर्जी यांनी सांगताच, मी लढणाऱ्या बापाचा मुलगा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात लढायचं की घाबरून रहायचं हे ठरवलं पाहिजे, असेही सांगितले.

एकजूटीने काम करणे आवश्यक

देशातील विरोधी पक्ष कमकुवत होताना दिसत आहे. त्यामुळे एकजूट होऊन काम करण्याची गरज आहे. मात्र, तेच होताना दिसत नाही, असं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटले. जीएसटीच्या मुद्यावर केंद्र सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. केंद्र सरकार केवळ त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या पक्षांना मदत करत असताना इतर राज्यांना ठेंगा दाखवत असल्याचा आरोप सोरेन यांनी केला.

केंद्रावर दबाव टाकण्यासाठी बैठकीचे आयोजन

या बैठकीला पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे देखील उपस्थित होते. गुरुवारी (दि.27) जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यांची थकबाकी मिळावी म्हणून जीएसटी परिषदेवर आणि पर्यायाने केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठीच काँग्रेसने ही बैठक बोललवल्याचं बोललं जात आहे.