मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपने सेलिब्रिटींवर दबाव आणून शेतकरी आंदोलनाविरोधात ट्विट करण्यास भाग पाडले हा काँग्रेसचा आरोप सत्य होता हे सिद्ध झाले असून पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत भाजपाच्या आयटी सेल व 12 व्यक्तींचा हात होता हे समोर आले आहे. भाजपाने देशविरोधी केलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला असून भाजपा आयटी सेल व 12 जणांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनीकेली आहे.
After our demand to probe if celebrities were arm-twisted by BJP, not a single celebrity came forth & said that it was his/her own opinion. Our demand was right. BJP'S IT cell & 12 influencers hv bn found involved. Further Inquiry will unmask BJP's huge conspiracy against India https://t.co/7WtNGdJDMp
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 16, 2021
यासंदर्भात सावंत म्हणाले की, आपल्या देशाच्या राष्ट्रीय हिरोंवरती दबाव आणून भाजपाने त्यांना ट्विट करण्यास भाग पाडले असा आरोप काँग्रेसने केला होता. यावरून भाजपाच्या चौकशीची मागणी करून अनेक दिवस उलट्यानंतरही राष्ट्रीय हिरोंपैकी एकानेही पुढे येऊन सदर ट्विटद्वारे मांडलेले मत हे त्याचे स्वतःचे असल्याचे सांगितले नाही. देशपातळीवर एवढे मोठे वादळ उठून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावेडकर व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपातर्फे केलेले षडयंत्र लपवण्याचा प्रयत्न केला. तसेच सदर प्रकरण पुढे येऊ नये आणि भाजपाचा कुटील चेहरा लपला जावा याकरता भाजपाचे नेते देशासाठी आदरणीय अशा भारतरत्न लता मंगेशकर व सचिन तेंडूलकर यांच्या मागे लपून महाराष्ट्र सरकार या भारतरत्नांची चौकशी करणार असा खोटा कांगावा करत होते. परंतु आता सत्य समोर आले असून या पुढच्या चौकशीतून भाजपाचा देशविरोधी कट समोर आल्याशिवाय राहणार नसल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
देशाकरता सर्वाधिक घातक व विषारी टूलकिट हे भाजपाचे असून याद्वारे भारतीय लोकशाही नष्ट करण्याचे काम भाजप करत आहे. मोदी सरकारची 56 इंच छाती किती पोकळ आहे. हे पर्यावरणवादी दिशा रवी या युवतीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून सिद्ध केले आहे. देशातील विचारवंतांचा आवाज अशाप्रकारे मोदी सरकारने दाबला आहे. परंतु हेच मोदी सरकार बालाकोटसारख्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर अर्णब गोस्वामीकडे अगोदरच माहिती कशी आली याची साधी विचारणाही करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ऑफिशियल सिक्रेट ऍक्टच्या कलम 5 चे उल्लंघन झालेले असतानाही त्याच्यावर खटला का दाखल होत नाही हा प्रश्न निश्चितपणे देशाच्या जनतेसमोर असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.