सुशांत सिंह रजपूत प्रकरणी CBI महिनाभरापासून गप्पच !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवर (sushant-singh-case) काही मंडळींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सीबीआयने (cbi) या प्रकरणाचा तपास केला. पण ते कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचू शकला नाही. मुंबई पोलीस व कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालावर शंका उपस्थित करत एम्सकडे ते तपासासाठी पाठवले. पण सुशांतने आत्महत्याच केल्याचा अहवाल एम्सच्या पॅनलनेही दिला. या अहवालाला एक महिना लोटला तरी सीबीआयकडून काहीच हालचाल नाही, कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नाही. त्यामुळे ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत (sachin-sawant) यांनी विचारला आहे.

सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्न विचारत सावंत यांनी सीबीआय बिहार विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करत आहे ? का पंतप्रधान मोदी यांनीच निवडणुका होईपर्यंत काही हालचाल करू नका, असे आदेश सीबीआयला दिले आहेत असे म्हटले आहे. तसेच सुशांत प्रकरणात राजकारण केले जात असून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे. हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने केला. यावर सुप्रीम कोर्टने शिक्कामोर्तब केले होते असे देखील म्हटले आहे. कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालाचीच पुष्टी एम्सच्या पॅनलनेही केली आणि सुशांतसिंहने आत्महत्या केल्याचे सिद्ध झाल्याने मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा भाजपा तोंडावर आपटला. सुशांतसिंहच्या मृत्यूचे गलिच्छ राजकारण करत मुंबई पोलीस व महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र होते. त्यासाठीच सीबीआयसह तीन तीन केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय वापर केला हे आता सिद्ध झाले आहे. त्यांचा कुटील डाव त्यांच्यावर उलटल्याने सीबीआयला गप्प राहण्यास सांगितले असावे, असेही सावंत यांनी म्हटले आहे.

एम्सच्या रिपोर्टमूळे भाजपाचे तोंड काळ झाले
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी ‘एम्स’ने दिलेल्या अहवालानंतर काँग्रेसने भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता. ‘एम्स’च्या अहवालामुळे भाजपचे तोंड काळे झाले आहे अशी जोरदार टीका सचिन सावंत यांनी केली होती. सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले होते.