संघाच्या ‘या’ माजी प्रवक्त्याला वाटतं कॉंग्रेसला किमान १०० जागा मिळायला हव्या होत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील याची खात्री होती. परंतु कॉंग्रेसला किमान १०० जागा मिळायला पाहिजे होत्या. असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केले आहे.

लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसला दारूण पराभव पत्करावा लागला होता. परंतु भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळालं. भाजपला ३०३ जागा मिळाल्या तर कॉंग्रेसला ५२ जागा मिळाल्या. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या या विजयाचे स्वागत करत भाजपला शुभेच्छाही दिल्या.

मा. गो. वैद्य हे अनेक वर्षे तरुण भारतचे संपादक होते. त्यांची राजकिय घटनांकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. लोकशाहीत सक्षम विरोधी पक्ष असायला हवा. म्हणून कॉंग्रेसला निदान १०० जागा मिळायला हव्या होत्या. कॉंग्रेसने आता गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष निवडायला हवा.

ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, मिलिंद देवरा अशा तरुण नेत्यांकडे नेतृत्व देऊन पक्षाचे संघटन मजबूत करायला हवा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. गांधी घराण्याच्या कोंडवाड्यातून कॉंग्रेस मुक्त होत नाही तोपर्यंत कॉंग्रेसचं भलं होणार नाही. अस परखड मतही त्यांनी व्यक्त केलं.