काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबित करून कृषी विधेयके मंजूर करून घेतली. केंद्र सरकार सातत्याने लोकशाहीची मूल्ये व संसदीय नियम पायदळी तुडवत आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे. सरकारने हे काळे कायदे मागे घ्यावेत, यासाठी देशभरातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. काँग्रेस पक्ष शेतकर्‍यांसोबत असून हे काळे कायदे मागे घेईपर्यंत संघर्ष करत राहील, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या कायद्याचा निषेध करत काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. काल राज्यभरात या कायद्यांविरोधात ऑनलाइन मोहीम चालवण्यात आली. या मोहिमेत काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. प्रत्येक जिल्ह्यात या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जनतेने भाजप सरकार व त्यांच्या शेतकरीविरोधी धोरणांचा तीव्र निषेध करून शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेण्याची मागणी सोशल मीडियावर केली आहे. त्यामुळे इथून पुढेही आमचा संघर्ष सुरुच असणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली आहे.