काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून मोदींना रक्तरंजित पत्रे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या वाहनावर भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण देशभरातुन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवली पाहिजे अशी प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सोशल नेटवर्किंग साईटसवर देखील मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली सोशल साईटसवर वाहण्यात येत आहे. आता पुण्यातील काँग्रेसच्या ५० कार्यकर्त्यांनी चक्क रक्ताने पत्रे लिहिली आहेत. या हल्ल्याला मोदी आणि त्यांचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप पत्रांद्वारे करण्यात आला असून राजीनाम्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे.

मोदींच्या राजीनाम्याची मागणी

पुणे शहर काॅंग्रेसचे सरचिटणीस अमित आबा बागूल आणि त्यांच्या ४९ कार्यकर्त्यांनी ही पत्रे लिहिली आहेत. पुलवामा येथे झालेला हल्ला दुर्दैवी असून त्याला मोदी आणि त्यांच्या सरकारला दोषी धरायला हवे. गेल्या पाच वर्षात वारंवार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाची खुर्ची शहिदांच्या रक्ताने माखली आहे. त्याला सर्वस्वी मोदी जबाबदार आहेत. वारंवार देशाचे सैनिक शहीद होत असताना आपली ५६ इंच छाती कुठे गेली असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी भारतीय लष्कर त्याचा अवश्य बदला घेईलच. आमचा सैन्यदलांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, मोदी आणि भाजपावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. मोदींचा राजीनामा हिच सैनिकांना खरी श्रद्धांजली असेल असेही या पत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

-‘प्रिय मोदीजी मन की बात के बदले खून की बात चाहीये’,
–‘इंडीया डिमांड रिअल सर्जिकल स्ट्राईक’, ‘हमे निंदा चाहिये…
–और एक भी आतंकी जिन्दा नही चाहिए’,
— ‘जगाच्या पाठीवरुन पाकिस्तानचे नाव मिटवा’,
— ‘नोटबंदी नको तर दहशतवाद बंदी करा

अशा अनेक जळजळीत प्रतिक्रिया असलेली ही पत्र आहेत. या हल्ल्यातील मृतांचा आकडा ४४ वर जाऊन पोचला आहे. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आली असून पाकिस्तानकडून याचा बदला घेतला पाहिजे अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून येऊ लागल्या आहेत. अनेकांनी केंद्र शासनाला पत्र आणि ईमेल पाठवून आपल्या प्रतिक्रिया कळविल्या आहेत. मात्र, बागूल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या रक्ताने लिहिलेली पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे पत्र कुरीअर आणि ईमेलद्वारे मोदींना पाठविण्यात येणार आहेत. ज्या प्रकारे सर्जीकल स्ट्राईकचे श्रेय मोदी घेतात तसेच या हल्ल्यामुळे आलेले अपयशही स्विकारले पाहिजे असे बागूल म्हणाले.

एकीकडे आज काँग्रेस आध्यक्ष राहुल गांधी यांनी ” आम्ही पुलवामा घटनेचा निषेध करीत असून या घटनेवर जी कारवाई केली जाईल त्यात काँग्रेसची केंद्राला साथ असेल” अशी प्रतिक्रिया पक्षश्रेष्ठी राहुल गांधी यांनी केली असताना कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोदी सरकार विरोधात रोष जाणवतो आहे. हा रोष तीव्रतेने व्यक्त करण्यात येत आहे.