मराठा समाजासह ते उदयनराजेंनाही फसवणार’  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण आणि नोकरीभरतीबाबत मराठा समाजाल फसवलं आहे. आता ते छत्रपती उदयनराजेंना फसवणार असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या राज्य समन्वयकांनी केला आहे. आज (मंगळवार दि 24 सप्टेंबर) पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्य समन्वयक म्हणाले, “सातार लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच उदयनराजेंचा जाणीवपूर्वक पराभव करणार आहे. पण याद राखा राजेंचा पराभव झाला तर भाजप सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील. उदयनराजे मराठा समाजाची अस्मिता आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आहे.”

पुढे ते म्हणाले, “नाशिकच्या सभेत उदयनराजेंचा अपमान करण्यात आला. परंतु ते याबाबत बोलू शकत नाहीत. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही. या निवडणुकीत भाजप विरोधात प्रचार करणार. मराठा क्रांती मोर्चा कोणतीही निवडणूक लढवणार नाही. जर कोणी समाजाच्या नावावर तसे करत असेल तर त्याला जागा दाखवून देऊ.” अशा इशाराही त्यांनी दिला.

राज्य समन्वयक म्हणाले, “मराठा आरक्षण मागणी आंदोलनात 42 जणांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी आणि प्रत्येकी 10 लाखांची मदत करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. प्रत्यक्षात मात्र ते आमलात आणलेले नाही.” असेही त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत राज्य समन्वयक महेश डोंगरे, संजय सावंत, बबन सुद्रीक, भगवान माकने, सतीश वेताळ, लक्ष्मण शिरसाठ, दत्ता मोरे, अमित घाडगे, हरिभाऊ बोडके, गजानन देठे, राजेंद्र गरड, शरद गायकवाड, कांतीलाल गिरे, शिवराज जोगदंड, अजित जाधव, आदी उपस्थित होते.

Visit : policenama.com