जेव्हा राहुल गांधींच्या विमानाचा पायलट आणि विशेष सुरक्षा दलात होतो वाद…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाला ओझर विमानतळावर येण्यास उशिर झाल्याने त्याची तपासणी करण्यावरुन पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर स्वत: राहुल गांधींनी दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी दर्शविल्यावर दोघेही चपापले व तणाव निवळला. ओझर विमानतळावर शनिवारी सकाळी हा प्रसंग घडला.

ओझर विमानतळावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमान उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्यावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला. दोघांनीही आवाज चढविल्याने विमानतळावर तणाव निर्माण झाला.
ओझर विमानतळावर सकाळी सात वाजेपासूनच विशेष सुरक्षा दल व पोलीस यंत्रणा उपस्थित होती. राहुल गांधी ओझर येथे येण्यापूर्वी काही वेळ अगोदर त्यांच्या विमानाचे पायलट विमानतळावर पोहोचले. त्यावेळी तेथे तैनात एसपीजीने पायलटकडे असलेल्या बॅगेची तपासणी करण्यावरुन वाद झाला. मी ४ वर्षापासून गांधींच्या विमानाचा पायलट असून आजवर असा अनुभव आला नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरु झाला.

सुरक्षा दलाने माफी मागावी अन्यथा विमान न चालविण्याचा निर्णय पायलटने घेतला. त्यामुळे अधिकाऱ्यांची धादंल उडाली.
थोड्याच वेळात राहुल गांधी तेथे आले. विमान उड्डाण घेण्यासाठी २० मिनिटांचा कालावधी शिल्लक असल्याचे पाहून राहुल गांधी यांचे लक्ष कडेला असलेल्या एचएएलच्या अग्निशामक दलाच्या पथकाकडे गेले. ते चालत गेले. तेथे त्यांनी अग्निशामक दलाच्या बंबावर चढून आतमध्ये बसलेल्या चालक व जवानांशी संवाद साधला.

पायलट आणि विशेष सुरक्षा दलातील वादाबाबत राहुल गांधी यांना समजल्यावर त्यांनी स्वत: दोघांचीही समजूत घालून दिलगिरी व्यक्त करण्याचा इरादा बोलून दाखविला. तेव्हा दोघांनीही नरमाईची भूमिका घेतली व वाद निवळला. त्यानंतर राहुल गांधी दिल्लीकडे रवाना झाले.