Corornavirus Impact : 143 वर्षात पहिल्यांदाच भगवान जगन्नाथ रथयात्रा साध्या पद्धतीने आयोजित होणार

अहमदाबाद : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गुजरातमधील अहमदाबादची जगप्रसिद्ध वार्षिक भगवान जगन्नाथ यात्रा साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. 143 वर्षात पहिल्यांदाच अगदी साध्या पद्धतीने ही यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये झांज, लोकांची गर्दी होणार नाही, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त महेंद्र झा यांनी दिली. यात्रेमध्ये केवळ तीन रथांचा समावेश असेल आणि प्रत्येक रथ 30 लोक ओढतील. आषाढी बीजच्या दिवशी म्हणजेच 23 जून रोजी ही रथ यात्रा होणार असून यामध्ये मंदिरातील पुजारी आणि विश्वस्त उपस्थित असतील, असेही झा यांनी सांगितले.

मंदिराचे विश्वस्त महेंद्र झा यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, 143 वर्षामध्ये पहिल्यांदाच तीन रथांचा समावेश केला जाईल. कोरोना विषाणूच्या साथीमुळे यावेळी ट्रकवर असलेले भक्त, आखाडे, गायक मंडळी, झांकी इत्यादी यंदा नसणार आहेत. रथयात्रा साधेपणाने आयोजित केली जाईल. लोकांनी या ठिकाणी गर्दी न करता टिव्हीवरुनच यात्रा पहावी अशी आमची इच्छा आहे.

परंपरेनुसार, भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या रथ यात्रेचा प्रवास 400 वर्षे जुने असलेल्या मंदिरातून पहाटे सुरु होतो आणि सायंकाळी उशीरा परत येऊन संपतो. ही यात्रा 12 तास चालते आणि 18 किलोमीटरचे अंतर पार करून पुन्हा भगवान जगन्नाथ मंदिरात परत येते. त्यांनी सांगितले की, आम्ही यावेळी शक्य तितक्या लवकर मंदिरात पोहचण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच सामाजिक अंतर आणि मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जाणार आहे.