Coronavirus : दिल्लीत 31 जुलैपर्यंत होतील 5.5 लाख केसेस, 80 हजार बेडची आवश्यकता : सिसोदिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत कोरोनाच्या कम्युनिटी स्प्रेडच्या धोक्याबद्दल मंगळवारी उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या अध्यक्षतेखाली डीडीएमएची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन उपस्थित होते. बैठकीत मनीष सिसोदिया म्हणाले की, अशाच प्रकारे प्रकरणे वाढत राहिली तर ३१ जुलैपर्यंत पाच लाखाहून अधिक कोरोना प्रकरणे होतील.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, ‘मी दिल्लीतील रुग्णालये सर्व रूग्णांसाठी उघडण्याबाबत मुद्दा मांडला आणि एलजी साहेबांना विचारले की, अखेर सरकारचा निर्णय का पलटला. यावर राज्यपाल कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत.’

ते पुढे म्हणाले, ‘एलजीच्या निर्णयामुळे दिल्लीकरांसमोर संकट उभे राहिले आहे. ज्या वेगाने संसर्ग वाढत आहे, त्यावरून असे दिसते की ३० जूनपर्यंत १५ हजार बेडची आवश्यकता असेल आणि ३१ जुलैपर्यंत ८० हजार बेड्स लागतील. ३१ जुलैपर्यंत ५ लाखाहून अधिक प्रकरणे होऊ शकतात.’

३ वाजता होणार सर्वपक्षीय बैठक
आपत्ती व्यवस्थापन बैठकीनंतर उपराज्यपाल अनिल बैजल यांनी दुपारी तीन वाजता सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीत कोरोनाची सद्यस्थिती आणि त्याला रोखण्याच्या उपायांवर चर्चा केली जाईल. आम आदमी पार्टी, भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेसचे नेते या बैठकीत उपस्थित राहू शकतात.

उपराज्यपालांनी बदलला केजरीवाल यांचा आदेश
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रूग्णालयात केवळ दिल्लीकरांच्या उपचाराचा आदेश देऊन फक्त २४ तासच झाले होते की, उपराज्यपालांनी हा आदेश बदलला. एलजी अनिल बैजल यांनी मुख्यमंत्र्यांचा आदेश रोखला आहे. उपराज्यपालांनी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून सीएमच्या निर्णयावर वीटो दाखल केले.

आता दिल्लीतील रुग्णालयात सर्व लोकांवर उपचार केले जातील, म्हणजे बाहेरून येणाऱ्यांनाही दिल्लीच्या सरकारी रुग्णालयात उपचार घेता येतील. एकीकडे उपराज्यपालांनी निर्णय बदलल्याने दिल्ली सरकार नाराज झाले. सीएम केजरीवाल यांनी त्वरित ट्विट करत दिल्लीकरांसाठी ही नवीन समस्या असल्याचे सांगितले.

केजरीवाल यांनी लिहिले, ‘एलजी साहेबांच्या आदेशाने दिल्लीच्या लोकांसाठी मोठी समस्या आणि आव्हान निर्माण केले आहे. देशभरातून येणाऱ्या लोकांसाठी कोरोना महामारी काळात उपचार देणे हे एक मोठे आव्हान आहे. कदाचित आपण संपूर्ण देशाच्या लोकांची सेवा करावी अशी देवाची इच्छा आहे. आम्ही प्रत्येकाच्या उपचारांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू.’

आम आदमी पक्षाचा हा राग भाजप खासदार गौतम गंभीरने आणखी भडकावला आहे. गंभीरने ट्वीट केले की, ‘इतर राज्यातील रूग्णांवर उपचार न करण्याच्या दिल्ली सरकारच्या मूर्खपणाच्या आदेशाचा अंत करण्यासाठी एलजी यांचे उत्तम पाऊल! भारत एक आहे आणि आपल्याला एकत्रितपणे या महामारीशी लढायचे आहे! इंडिया फाइट अगेन्स्ट कोरोना.’