वाढत्या कोरोनामुळे पुन्हा लॉकडाउन करणार? आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. सध्या काही लोक या कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रसारमाध्यांशी बोलताना म्हणाले, राज्यात वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाउन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. तसेच ते पुढे म्हणाले, राज्यात संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीच लक्षणे नाहीत. त्यामुळे या रुग्णांमधील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला दिला गेला आहे. राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम करण्यात येत आहे, तसेच कोरोना चाचण्यांची संख्यासुद्धा वाढत आहे.

लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनीदेखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांनी करावा, त्यामुळे कोरोनाला आळा बसू शकतो. यामुळे लॉकडाउन टाळण्याकरिता नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

राज्यात गेल्या २४ तासात कोरोना रुग्णाने १६ हजारांचा टप्पा पार केला आहे. या वर्षातील ही सर्वांत जास्त रुग्णसंख्या मानली जाते. राज्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सध्या दररोज सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यामध्ये लशीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यात येत आहे. तसेच ६० वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहनसुद्धा आरोग्यमंत्र्यांकडून करण्यात आले आहे.