शहरात फिरताहेत ‘कोरोना’ पॉझिटीव्ह, हायकोर्टानं दिले ‘हे’ आदेश !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण शहरात फिरत असल्याचं आढळून आलं आहे. त्यांनी घरातच राहून उपचार घेणं आवश्यक आहे. त्यामुळं कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या हातावर स्टॅम्प लावण्यात यावा. तर कोरोनाची तपासणी करणाऱ्यांच्या बोटाला शाई लावण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्तांना दिला आहे.

कोरोनामुळं शहरातील वाढता मृत्यू दर पाहता याची दखल घेत न्यायालयानं स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली. यावर न्या रवी देशपांडे आणि न्या पुष्पा गनेडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा न्या रवी देशपांडे यांनी शहरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण फिरत असल्यानं कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होत आहे असं निरीक्षण नोंदवलं. या रुग्णांनी घरात किंवा रुग्णालयात राहून उपचार घेऊन गरजेचं आहे. परंतु ते घराबाहेर खरेदी करण्यासाठी, कार्यालयीन कामासाठी जात असतील तर त्यांची ओळख पटवणं आवश्यक आहे. ते कारण नसताना घराबाहेर जात असतील तर त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात यावं असं मतही त्यांनी नोंदवलं.

यावेळी विभागीय व महापालिका आयुक्तांनी अशा प्रकारे लक्षणं नसणाऱ्या कोरोना लक्षणं नसणाऱ्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना स्टॅम्प लावता येणार नाही असं सांगितलं. कोरोना लागण होणं हा एक सामाजिक कलंक मानला जातो. त्यामुळं जर असा स्टॅम्प लावला तर याचा नकारात्मक परिणाम रुग्णांवर होईल असंही त्यांनी नमूद केलं.

त्यावर न्यायालयानं वरिष्ठ वकिल सुबोध धर्माधिकारी यांचा अभिप्राय मागितला. अ‍ॅड धर्माधिकारी म्हणाले, “कोरोनाची बाधा होणं हा आता सामाजिक कलंक राहिलेला नाही. शहरातील प्रत्येक कुटुंबातील एकाला कोरोना झाला आहे. त्यामुळं जर लक्षणं नसणाऱ्यांना होम क्वारंटाईन ठेवायचं असेल तर त्यांच्या हातावर स्टॅम्प लावण्यात यावा” असं त्यांनी सुचवलं.

यानंतर हायकोर्टानं कोरोना पॉझिटीव्हचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णांच्या हातावर तिथेच स्टॅम्प लावण्यात यावा. इतकंच नाही तर कोरोना टेस्ट केल्याची ओळख पटावी यासाठी तपासणीसाठी जाणाऱ्या व्यक्तीच्या बोटावर शाई लावण्यात यावी. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून 25 तारखेला कृती अहवाल सादर करावा असा आदेश दिला. न्यायालय मित्र म्हणून अ‍ॅड श्रीरंग भांडारकर यांनी, मनपातर्फे सुधीर पुराणिक, सरकारतर्फे दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.

साठेबाजी करणाऱ्या रुग्णालयांची तपासणी करा

जीवनरक्षक औषधं आणि ऑक्सिजनचा काही रुग्णालयांकडून अतिरीक्त साठा करून ठेवण्यात येत आहे. त्यामुळं औषधं आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे अशी माहिती अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरूण उन्हाळे यांनी हायकोर्टात दिली. तेव्हा अशा प्रकारे साठेबाजी करणाऱ्या रुग्णालयांची सहआयुक्तांनी तातडीनं तपासणी करावी आणि गरजेपेक्षा अधिक साठा आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करावी असा आदेशही कोर्टानं दिला.