… विरोधकांना हीच खरी पोटदुखी आहे, गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांची भाजपवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयमाने आणि सगळ्यांना सोबत घेऊन सरकार उत्तमपणे चालवले आहे. विरोधकांना हीच खरी पोटदुखी आहे, अशी टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Housing Minister Jitendra Awhad) यांनी केली आहे.

ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मंत्री आव्हाड यांनी ठाकरे सरकारचा एक वर्षाचा कारभार, राज्यातील कोरोनाची परिस्थिती, आघाडी सरकारमधील समन्वय, विरोधी पक्ष म्हणून भाजपची भूमिका आदी विविध विषयांवर भाष्य केले आहे.

एक वर्षाचा कारभार तुम्ही कशा पद्धतीने बघता?
कोरोनामुळे यंदाचे वर्ष अडचणीचे ठरले. दुर्दैवाने सात ते आठ महिने सरकारचे काम गतीने चालले नाही. कारण अनेक ठिकाणी लॉकडाउन होता. आता पुन्हा नव्याने कामाची सुरुवात झाली आहे. पण या वर्षभरात लोकांच्या हाताला काम देणे, पोटाला अन्न देणे आणि जगण्याची उमेद देणे या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. सरकार म्हणून आम्ही त्या समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

तिन्ही पक्षात 100 टक्के समन्वय आहे
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षात शंभर टक्के समन्वय होता आणि आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला एकत्र काम करण्याचा अनुभव आहे. आम्ही शिवसेनेसोबत काम करतानादेखील पूर्ण समन्वयाने काम केले आहे. मतभेद नाहीत, मात्र काही विषयांवरून चर्चा होते, प्रत्येक मंत्री आपल्या विभागाबद्दल आग्रह धरतो, त्याचा अर्थ आम्ही वाद घालतो किंवा आमच्यात भांडणे आहेत, असा काढणे पूर्णपणे चुकीचे आहे.

भाजपला असे बोलण्याशिवाय पर्याय नाही…
राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत जाईल अशी चर्चा आहे, याबाबतच विचारले असता ते म्हणाले, असे कदापि होणार नाही. आपला पक्ष तुटू नये म्हणून भाजपला हे असे बोलण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यांनी आमदारांना सत्तेचे आमिष दाखवून त्यांच्याकडे नेले. तेच आमदार आता त्यांना भंडावून सोडत आहेत. राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा विषयच येत नाही.

विरोधी पक्ष म्हणून भाजपची वर्षभरातील भूमिका कशी होती?
विरोधी पक्षाकडे गांभीर्य नाही. बिहार निवडणुकीसाठी त्यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण लावून धरून महाराष्ट्राची बदनामी केली. एका मराठी उद्योजकाने केलेल्या आत्महत्येमध्येदेखील त्यांनी चुकीची बाजू घेतली होती.

राज्यातील जनता विचारी आहे. ती बोलून व्यक्त होत नसली तरी या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवत असते. भाजप ज्या विषयावर महाराष्ट्रात राजकारण करत होते, त्याच विषयांवर केंद्र सरकारची वेगळी भूमिका होती. लोक हे सर्व पाहत आहेत.
जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री