औरंगाबादमध्ये ‘कोरोना’ रुग्णांची संख्या 200 ‘पार’, प्रशासनाने घेतला मोठा ‘निर्णय’

औरांगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात कोरोना फैलाव वेगाने होत असून राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून शुक्रवारी (दि.1) शहरात 39 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 216 वर पोहचली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. शहरातील काही भाग हॉटस्पॉट बनले आहेत.

औरंगाबाद शहरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरात ऑड-ईवन (सम-विषम) फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यक वस्तू खरेदी करताना नागरिकांची जास्त गर्दी होऊ नये, यासाठी शहरात 3 मे नंतर सम-विषम फॉर्म्यूला लागू करण्यात येणार आहे.

काय आहे सम-विषम फॉम्युला
शहरामध्ये 4,6,8,10,12,14,16 मे या सम तारखांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्य़ंत नागरिक आवश्यक वस्तू खरेदी करू शकतात. तर 3,5,7,9,11,13,15 या विषम तारखांना मात्र शहरातील सर्व दुकाने 24 तास बंद राहतील. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. औषधाची दुकाने आणि दवाखान्यांना यातून सूट देण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच पोलिसांचा शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.