‘कोरोना’ लस वितरणात लोकप्रतिनिधींचा प्राधान्यक्रम ठरवावा

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे संकट आल्यापासून सर्वच स्तरांतून प्रतिबंधक उपाययोजनांसाठी परिश्रम करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी तसेच आमदार, खासदार यांनीही आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची अहोरात्र सेवा केली असून, काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे लशीचा प्राधान्यक्रम ठरविताना लोकप्रतिनिधींचादेखील अग्रक्रमाने समावेश असावा, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानां दिले आहे.

कोरोनाचे संकट आल्यानंतर प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सर्वांनीच कंबर कसली आहे. त्यामध्ये ज्याला कोणत्याही प्रकरची विमा सुरक्षा नाही, अशा व्यक्तीही या कामात पुढाकार घेतल्याच्या दिसल्या. आजतागायत त्यात्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारची विम्याची सुरक्षा नसताना आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करीत आहेत. ठाण्याचे नगरसेवक मुकुंद केणी, विलास कांबळे, कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दशरथ घाडीगावकर, मीरा-भाईंदरचे नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर, पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवक दत्ता साने यासह मुंबई, वसई-विरार या परिसरात कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकांचा यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक लोकप्रतिनिधी कोविडबाधित झाले. त्यातून बरे झाल्यानंतर ते पुन्हा जनतेची सेवा करीत आहेत.

लॉकडाउन काळात नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा करणे, आरोग्य यंत्रणा व सुविधा उपलब्ध करून देणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे, कंटेनमेंट झोन निश्चित झाल्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, सतत पालिका आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधणे, आजाराबाबत जनजागृती करणे, वेळप्रसंगी कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांना भेटून दिलासा देणे, आवश्यक मदत देणे अशा असंख्य कामांमध्ये नगरसेवकांनी योगदान दिले आहे. त्यामुळे लस वितरणाचा प्राधान्यक्रम ठरवताना लोकप्रतिनिधींचाही अग्रक्रमाने समावेश करावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.