Coronavirus Lockdown : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची हायव्होल्टेज बैठक, लॉकडाऊनसह 5 ‘या’ मोठ्या मुद्यांवर काय ठरलं ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची सख्या सर्वाधिक आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या सरकारची चिंता वाढवत आहे. आज कोरोना संदर्भात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य मत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन, कोरोनाबाधितांचा वाढता मृत्यूदर अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली.

बैठकीत काय ठरलं ?
1. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या मृत्यूदराबाबत काही मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली .तसंच केरळमध्ये मृत्यूदर कमी असण्याची नेमकं कारण काय आहे, याबाबत मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी चर्चा केली.
2. लॉकडाऊनच्या कालावधीबाबत अद्याप निर्णय नाही. येत्या काही दिवसांत राज्यातील परिस्थिती पाहून मुख्यमंत्री निर्णय घेणार
3. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शहरातील स्थितीबाबत मंत्रिमंडळ बैठकीआधी प्रेझेंन्टेशन दिलं.
4. कोरोनाला रोखण्यासाठी दररोज जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या होण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
5. महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यातील मजुरांना प्रश्नांविषयीदेखील आजच्या बैठकीत चर्चा झाली. इतर राज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडवण्यासाठी मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, देशभरातील लॉकडाऊन संपल्यानंतरच हे शक्य होणार आहे.
महाराष्ट्रातील सद्य स्थिती
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक महाराष्ट्रात झाला आहे. पुण्यात कोरोनाबाधित असलेल्या 3 जणांचा मंगळवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत मृत्यू झाला. तर मुंबईत आज आणखी 10 नवीन रुग्ण आढळून आले. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 891 वर पोहचला आहे. राज्यात आज सकाळपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 23 ने वाढला.