धक्कादायक ! जाळण्यासाठी लाकडे नाहीत म्हणून लोक नदीत फेकताहेत ‘डेडबॉडी’? 45 मृतदेह सापडल्यानंतर खळबळ

बक्सर : वृत्त संस्था – कोरोनाने मरणार्‍या लोकांच्या आकड्यांमध्ये हेराफेरी करणे शक्य आहे, परंतु बक्सरच्या चौसामध्ये महादेव घाटावर वाहत आलेल्या मृतदेहांनी स्पष्ट केले आहे की आपत्ती किती भयंकर आहे. आता बक्सर चौसामध्ये महादेव घाटावर नदीच्या किनार्‍यावर मृतदेह वाहून येत असल्याने माणुसकीला काळीमा फासला जात असताना सुद्धा यावर राजकारण सुरू झाले आहे.

जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात हात वर करत म्हटले आहे की, हे मृतदेह बिहार किंवा बक्सरचे नसून उत्तर प्रदेशातील आहेत, जे येथे वाहून आले आहेत. महादेव घाटावर मृतदेहांचे ढीग लागल्याचे हे छायाचित्र विचलित करणारे आहे. असे वाटत आहे की, मृतदेहांनी महादेव घाटाला पूर्णपणे झाकून टाकले आहे.

या घटनेचा व्हिडिओ समोर येताच जिल्हा प्रशासनाने हात वर करण्यास सुरूवात केली. चौसाचे बीडीओ अशोक कुमार यांनी सांगितले की, सुमारे 40 ते 45 मृतदेह असतील जे वेगवेगळ्या ठिकाणी वाहून महादेव घाटातवर आले आहेत.

बीडीओने स्पष्टपणे सांगितले की, मृतदेह आमचे नाहीत. आम्ही घाटावर रखवालदार ठेवला आहे जेणेकरून मृतदेहांवर व्यवस्थित अंत्यसंस्कार करण्यात यावेत. हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत येत आहेत आणि येथे किनार्‍याला लागले आहेत. युपीचे मृतदेह येथे येण्यापासून रोखण्यासाठी कोणताही उपाय नाही, यासाठी आम्ही याची व्यवस्था करत आहोत.

कोरोनाने बक्सरसह अन्य जिल्ह्यांत विध्वंस चालवला आहे. महामारीमुळे स्थानिक रहिवाशी नरेंद्र कुमार मौर्य यांनी सांगितले की, चौसा घाटाची स्थिती खुपच दयनीय आहे.

त्यांनी म्हटले, येथे दररोज 100 ते 200 कोरोना संक्रमित मृतदेह येतात आणि लाकडांची व्यवस्था नसल्याने मृतदेह गंगेत फेकले जातात, ज्यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याची भीती वाढली आहे. प्रशासनाने कोणतीही व्यवस्था केलेली नाही.

बक्सरचे एसडीओ के. के. उपाध्याय यांनी सुद्धा हेच म्हटले की, हे मृतदेह बिहारचे नाहीत, ते उत्तर प्रदेशातीलच असावेत. कारण आमच्या येथे मृतदेह जाळण्याची परंपरा आहे. मात्र, स्थानिक लोक यास थेटपणे प्रशासनाची उदासिनता म्हणत आहेत.