मोठी बातमी ! …तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येचा आलेख रोज वाढत आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही एकट्या पुण्यात आहे. त्यामुळे इतर जिल्ह्याप्रमाणे पुण्यातही लॉकडाऊन लागू होणार अशा चर्चा सुरु आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यावर मोठं विधान केले आहे.

पुण्यातील आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, ‘पुण्यातील परिस्थिती फार गंभीर आहे. लोकांना मास्क, सोशल डिस्टन्स राखणे गरजेचे आहे. 1 एप्रिलापासून जे काही कार्यक्रम आहेत जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी ते खाजगी कार्यक्रम बंद केले पाहिजेत. कोरोनाबाधितांची संख्या पुण्यात वाढत आहे. त्यानुसार 50 टक्के खाजगी बेड ताब्यात घेण्यात येणार आहेत. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधला आहे. राज्यातील 316 लसीकरण केंद्रे ही शहर आणि ग्रामीण भागात आहे. ती दुप्पट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच लग्न लॉनमध्ये करा किंवा इतर कुठेही त्याची संख्या 50 पेक्षा अधिक असू नये’.

दरम्यान, ‘नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर नियमांचे पालन केले नाही पुढील 5-6 दिवस असेच सुरु राहिले तर 2 एप्रिलला कठोर निर्णय घ्यावे लागतील. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही’, असेही अजित पवार म्हणाले.