Coronavirus : मुख्यमंत्र्यांसोबतच्या ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’मध्ये PM मोदींनी मांडले 21 महत्त्वाचे ‘मुद्दे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून देशातील राज्यांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली. या बैठकिमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. यापूर्वी तीन वेळा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. मागील तीन बैठकीमध्ये संधी न मिळालेल्या मुख्यमंत्र्यांना यावेळी पंतप्रधानांनी प्राधान्यानं बोलण्याची संधी देण्यात आली. या बैठकीत मोदींनी 21 महत्त्वाचे मुद्दे मांडले
PM मोदी काय म्हणाले ?

1. योग्य वेळी आपण लॉकडाऊनचा निर्णय घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली. जनतेनेदेखील चांगली साथ दिली. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला, ते आपण पहातोय.

2. कोरोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता जे 20 देश यामध्ये भरताबरोबर होते, आज 7 ते 8 आठवड्यांनी भारताच्या तुलनेत या देशांमध्ये 100 पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे. याशिवाय मृतांचा आकाडा देखील कितीतरी जास्त आहे.

3.पण भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला 21 दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसरा टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे.

4. आपल्या देशात अनेक लोक, विद्यार्थी, यात्रेकरू वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले आहेत. त्यांना आणायचे आहे. परदेशातून अनेक भारतियांना आणायचे आहे. त्यांना लगेच चाचण्या करुन क्वारंटाईन करायचे आहे.

5. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचा हे राज्यांनी ठरवायचे आहे.

6. लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण तयार करा.

7. कोरोना दिर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धरणं ठरवा. दो गज दूरी हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूप काळासाठी ठेवणारे धोरण तयार करा.

8. एका बाजूला आपल्याला कोरोनाचा सामना करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरु करायचे आहेत.

9. 3 मे ही दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोनमध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

10. पुढे जाऊन रेड, ऑरेंज, ग्रीन झोन निहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागले. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील इत्यादी गोष्टींचा यात समावेश असेल.

11. संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही यासाठी अटोकाट प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा.

12. मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत. पण उर्वरित ठिकाणी ते पसरणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मुल्यांकन करा. संक्रमित व्यक्तींचे संपर्क जास्तीत जास्त तपासा.

13. सध्याच्या उद्रेकात ग्रीन झोन्स म्हणजे तर तीर्थस्थळेच म्हटली पाहिजेत.

14. येणाऱ्या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवन पद्धती, आपले कामकाज त्यानुरूप बनवण्याची गरज आहे. असे झोन्स फुल फ्रुफ करा.

15. ज्या राज्यांत कोरोनाचा आकडा वाढतोय म्हणजे काही ती राज्ये गुन्हेगार आहेत असे नाही. आकड्यांचा दबाव घेऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी मान खाली घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांकडे आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान आहेत असा अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत. काहीही लपवू नका.

16. कोरोनाशिवाय इतर आजारांचा सामना करणाऱ्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत. यात ढिलाई नको. आपली परंपरागत वैद्यकीय व्यवस्था सुरु राहिलीच पाहिजे. डॉक्टरांनी दवाखाने सुरु केले पाहिजेत.

17. ज्या क्षेत्रांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे, तिथे अर्थातच आर्थिक नुकसान अधिक आहे. 20 एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली परंतु त्यामुळे आपले आव्हानही वाढले आहे. नक्की कुठले प्रश्न वाढले आहेत त्याचा अभ्यास करा.

18. रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंज झोनमधून ग्रीन झोन कसे करायचे याचे नियोजन आवश्यक आहे.

19. प्रत्येक राज्याने सुधारणांवर लक्ष द्या. संकटात संधीला बदला.

20. तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होऊ शकतो. गर्दी आणि गडबड टाळू शकता.

21. सुधारणा घडवण्याची हीच सुसंधी आहे. अनेक जुने आणि किचकट नियम आणि प्रक्रिया बदलण्याची संधी सोडू नका. आपदधर्माचे पालन करा. नीती आणि नियम जुने असतील तर आलेली संधी जाईल.