Coronavirus : राज्यात 2287 नवीन रुग्ण तर 103 बळी, कोरोना बाधितांची संख्या 72 हजारावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या काही कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासात राज्यात 103 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या 2465 वर पोहचली आहे. तर राज्यात 2287 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधिक रुग्णांची संख्या 72 हजार 300 वर पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात 1225 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 31 हजार 333 वर पोहचली आहे.

राज्यात संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 72 हजार 538 खाटा उपलब्ध असून सध्या 35 हजार 097 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 103 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई 49, ठाणे 1, नवी मुंबई 4, पनवेल 4, रायगड 6, मीरा भाईंदर 10, नाशिक 1, अहमदनगर 1, पुणे 10, सोलापूर 5, सातारा 6, सांगली 3, अकोला 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 68 पुरुष तर 35 महिला आहेत.

आज मृत्यू झालेल्या पैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 59 रुग्ण आहेत तर 39 रुग्ण हे वय 40 ते 59 वर्ष वयोगटातील आहेत. तर 5 जण 40 वर्षाखालील आहे. मृत 103 रुग्णांपैकी 69 जणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी 38 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत.