Coronavirus : महाराष्ट्रातील 3 तरूण इराणमध्ये बोटीवर अडकले

पोलीसनामा ऑनलाईन टीम – जगभरात कोरोनाच्या भाीतीमुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे इराणमधील अबादान बंदरातील बोटीमधून बाहेर पडण्यास मज्जाव केल्यामुळे ठाण्यातील एका तरुणासह महाराष्ट्रातील तिघे जण बोटीवरच अडकले आहेत. या बोटीवरील अन्य देशांतील उर्वरित 30 कर्मचार्‍यांची संबंधित देशांकडून सुखरुप सुटका करण्यात आली. दरम्यान, या तरुणांची सुटका करण्यात यावी, यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे.

आखातातील अमिर बोटीवर महाराष्ट्रातील विवेक विष्णू माळकर राहणार किसननगर, सौरभ शशिकांत पिसाळ रा. भांडुप आणि अँथोनी जॉन पॉल रा. कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत.

इराणमध्ये कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर अबादान बंदरातील बोटीवरील कर्मचार्‍यांना बाहेर पडण्यास तडकाफडकी बंदी घालण्यात आली. त्यामुळे 8 दिवसांपासून अमिर बोट गोदीतच तळ ठोकून आहे. दरम्यानच्या काळात बोटीवरील 30 कर्मचार्‍यांची संबंधित देशांकडून सुटका करण्यात आली. मात्र, आता भारतातील तिघे कर्मचारी अडकले आहेत. त्यामध्ये ठाण्यातील किसननगर, भांडूप आणि कोल्हापुरातील तरुणाचा समावेश आहे. या तरुणांची बोटीतून सुटका करण्यासाठी इराणमधील भारतीय राजदूतांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे करण्यात आली आहे.