‘आयुष्मान भारत’चे कार्यालय सील, एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 17 हजाराच्या पुढे गेला आहे. दिल्लीतही कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान, दिल्लीच्या कॅनॉट प्लसमधील जीवन भारती इमारतीत असलेले आयुष्मान भारतचे कार्यालय सील करण्यात आले आहे.

आयुष्मान भारतच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे कार्यालय सील करण्यात आले आहे. तसेच कार्यालयातील 25 कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. आयुष्मान भारतचे कार्यालय पाच दिवस आधीच सील करण्यात आले असून आता येत्या 24 एप्रिलला उघडण्यात येईल. आयुष्मान भारचे सीईओ डॉ. इंदु भूषण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. देशात आतापर्यंत 17265 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासात 1553 नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 17265 लोकांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.