Coronavirus : ‘मुख्यमंत्र्यांनी केवळ भाविनक भाषण करून काही एक होणार नाही’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक भाषण करुन काहीही होणार नाही. लोकांना मदतीचीही गरज आहे. शटडाऊन करत असताना मदतनिधीही गरजेचा आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र सरकार इतर राज्य सरकारांप्रमाणे मदतनिधी जाहीर का करत नाही अशी विचारणा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

कोरोनामुळे प्रत्येक स्तरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असताना सरकारकडून त्यांना आर्थिक मदत दिली गेली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात 144 कलम लावण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकार मदतनिधी जाहीर का नाही करत ? प्रत्येक स्तरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असून त्यांना राज्य सरकारकडून मदत दिली पाहिजे. असे मत व्यक्त केले. दरम्यान, मुंबईतील चाकरमान्यांनी कोकणात येऊ नका असे आवाहन करीत राणे यांनी सलग सुट्टी असल्यामुळे खूप चाकरमानी आपल्या गावाकडे म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे निघाले आहेत. या लोकांनी गावी न येता आपल्या मुंबईच्या घरी राहावे. कारण गावी आल्यामुळे इथे व्हायरस पसरण्याची शक्यता आहे. ही वेळ सुट्टी नाही आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्याची आहे. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, तळहातावर पोट असणार्‍या कामगार, कर्मचार्‍यांना किमान वेतन चालू ठेवा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपन्यांना केली आहे. अमेरिकेतल्या ट्रम्प यांच्यापासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे. पण माणुसकी बाळगा. संकटाने कोणालाही सोडलेले नाही. आपणच आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहात. त्यांना जपणे सगळ्यांचे काम आहे. किमान वेतन चालू ठेवावे अशी विनंती आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.