CM उद्धव ठाकरे यांचे आवाहन, म्हणाले – ‘कोरोना काळात साधेपणाने साजरा करा गणेशोत्सव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   सध्या देशासह राज्या कोरोना विषाणूचा फैलाव अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेसह देश आणि राज्य पातळीवर आपआपल्या परीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना काळातील गणेशोत्सव हा सामाजिक भान राखून शांततेने साजरा करावा. तसेच या कोरोना काळात गर्दी होणार नाही, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच गाफील न राहाता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू असून त्या यापुढेही राबवाव्यात, असे देखील निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव तसेच राज्यातील कोरोना काळातील उपाययोजना यांचा घेतला. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली. याबैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, राज्य टास्क फोर्सचे सदस्य सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय कोरोना संदर्भातील उपाययोजना आणि मृत्यूदर याबाबत आढावा घेतला.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरात साजरे केले. तसेच सरकार, शासनाला सहकार्य केले आहे. याप्रमाणेच आताही गणेशोत्सव आणि मोहरम हे सण गर्दी न करता साजरे करण्यात यावेत. गणेशोत्सवाबाबत गृहविभागाने मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक निर्गमित केले असून त्यातील तरतूदींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणेशमूर्ती 4 फुटांची असेल तर, घरगुती गणेशमूर्ती 2 फुटांची असावी, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले. त्याचे पालन करतानाच आगमन आणि विसर्जन मिरवणूका निघणार नाहीत. तसेच गणेशोत्सवात गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. कोरोना विषाणूचा फैलाव आणखी वाढणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच गृह विभागाचे परिपत्रक सर्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

विसर्जनादरम्यान होणारी गर्दी टाळावी

या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन शक्यतो घरीच करावे. जिथे शक्य नाही तिथे अधिक प्रमाणात कृत्रिम तलाव निर्माण करावेत. तसेच तेथेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घेऊन विसर्जनाची व्यवस्था करावी. महापालिका यंत्रणेकडे गणेशमूर्ती दान करावे, असेही आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

गणेशोत्सवातून सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश दिला जावा.कोरोना आणि एकंदरीत आरोग्यविषयक जनजागृती मोहिम होती घ्यावी, असे आवाहन करताना दर्शनासाठी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध द्यावे. उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राहील, याची काळजी घ्यावी. गणेशोत्सवासाठी कोकणात अधिक प्रमाणात लोक गेले असून तिथे अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मृत्यूदर रोखण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या

कोरोनासंदर्भात आढावा घेतल्यानंतर सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले, काही ठिकाणी परिस्थिती आटोक्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात राहील, याकडे लक्ष दयावे. मृत्यूदर रोखण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. महाराष्ट्र राज्यात ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. तेथे अतिदक्षता विभागातील (आयसीयू) बेड आणि ऑक्सीजनची व्यवस्था असलेले बेड वाढवावेत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेत.

कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे

कोरोना उपचारासाठी जम्बो सुविधांची उभारणी राज्यभर सुरु आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. तसेच कोरोनाचा फैलाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सध्या पावसाळ्यात आजार डोके वर काढतात, त्याकडे लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. तसेच चाचण्यांचे दर नियंत्रित राहतील, याकडे लक्ष दिले जावे. चाचणी अहवाल लवकर येईल, यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कोरोना समस्येतून बरे होऊन घरी गेल्यानंतर रुग्णांना पुन्हा त्रास होत आहे. त्यामुळे पोस्ट कोविड परिस्थितीकडे, रुग्णांकडे लक्ष देण्याची अधिक आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना दक्षता समित्यांमधून गावात जनजागृती मोहिम

स्वयंशिस्त राखणे, मास्क वापरणे, हात धुणे, स्वच्छता राखणे हे उपाय कोरोनावर सध्याचे औषध असल्याचे सांगताना आज 80 टक्के रुग्णांना कोरोना आजाराची लक्षणे नाहीत. पण, ते संक्रमण करू शकतात. त्यांच्या माध्यमातून होणारा प्रसार गंभीर असल्याने अशा रुग्णांचे विलगीकरण करणे, त्यांना क्वारंटाईन करणे, आवश्यक असून या रुग्णांकडे दुर्लक्ष करू नये. कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावात जनजागृती मोहिम राबवावी, असेही आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोनाच्या विषाणुला जोपर्यंत हरवत नाही, तोपर्यंत अहोरात्र अविश्रांत मेहनत सुरु ठेवावी, असेही त्यांनी यावेळी यंत्रणेला सांगितले आहे.

अजित पवार म्हणाले, कायमस्वरूपीच्या सुविधांसाठी रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करावे.

गणेशोत्सवासाठीचे मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक राज्यात सर्वांसाठी एकसारखे असावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृह विभागाला केलीय. लिक्वीड ऑक्सीजन पुरवठ्याकडे मुख्य सचिवांनी लक्ष द्यावे. त्याचे दर वाढणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

जिल्ह्यातून आलेल्या निधीच्या मागणीबाबात अजित पवार म्हणाले, एसडीआरएफ, जिल्हा विकास निधी (डीपीसी) वापरावा. सीएसआरचा निधी अधिकमिळवण्यासाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष द्यावे. राज्यात जम्बो सुविधा उभ्या करत आहोत. पण, त्याचबरोबर विभागीय आयुक्तांनी, जिल्हाधिकार्‍यांनी आहे. त्या रुग्णांलयांत हा निधी खर्च करून तिथे आयसीयु बेड, ऑक्सीजनची सुविधा निर्माण करून या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन केल्यास कायमस्वरूपी सुविधा म्हणून त्या उपयोगात येऊ शकतील.

चुकीच्या व्हिडिओंवर पोलीसांनी लक्ष ठेवावे- गृहमंत्री अनिल देशमुख

समाजमाध्यमांवर प्रसारित होणार्‍या चुकीच्या व्हिडिओंवर पोलिसांनी लक्ष ठेवावे. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची स्थानिक यंत्रणेने अधिकाधिक निर्मिती करावी. यामुळे विसर्जनाला गर्दी होणार नाही, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिल्या.

टेलीआयसीयुचा विस्तार करण्याची गरज -आरोग्यमंत्री

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांना मोफत उपचार मिळतील. यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तालुकास्तरावर रुग्णवाहिका उपलब्ध राहतील, याकडे जिल्हाधिकर्‍यांनी लक्ष घालावे. लवकर निदानासाठी काही जिल्ह्यांमध्ये कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याची आवश्यकता आहे. चाचण्यांची क्षमता पुरेशी असून त्याचा पूर्णपणे वापर करावा, असेही आवाहन आरोग्मंत्र्यांनी केले आहे.

टेलीआयसीयु सुविधा महाराष्ट्र राज्यात सुरू झाली आहे. भिवंडीत त्याच्या वापराने फायदा होत आहे. जेथे विशेषज्ञ उपलब्ध नाही तेथे ही सुविधा फायदेशीर ठरत आहे. सध्या सीएसआरच्या माध्यमातून ही योजना सुरू असून राज्यात तिचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.