Lockdown बाबत CM ठाकरे यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘मी आज निर्णय घेतला नाही तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कठोर निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही. त्यामुळे  आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 10) झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दिला. तसेच सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याला सहकार्य करावे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

राज्यातील कोरोनासंदर्भातील परिस्थिती आणि उपाययोजना याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी  विरोधी पक्षनेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार,  मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील आदींनी आपल्या सूचना मांडल्या. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या सूचनांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कडक निर्बंध लावतांना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये ही सर्वांचीच भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार केला जाईल.  पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ  रोखणे अतिशय गरजेचे आहे. कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे. एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे. अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल असे ते म्हणाले.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. पण  आता सर्व खुले झाले आहे. त्यामुळे  यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे. एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. युकेने 2 आधीच महिने कडक लॉकडाऊन केला पण त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणे देखील आम्ही सातत्याने विचारात घेत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल. त्यांनी चांगल्या सुचना मांडल्या आहेत. विशेषत: रेमडीसिव्हीर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळणे, प्रयोगशाळाना यासाठी सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल. आपण हे सर्व काही करू पण या क्षणाला वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे. मी गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलत आहे.  काल मी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी पण बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांनी तयारी दर्शवली असल्याचे ते म्हणाले.