Coronavirus : दिलासादायक ! भारतातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत घट, सरासरी दर 18.17 टक्क्यांवर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत असताना आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होताना दिसत आहे. गेल्या 2 महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र, तब्बल 26 दिवसांनंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 24 तासांत 3 लाखांपेक्षा कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार कोरोनाबाधितांची गेल्या 24 तासांतील रुग्णसंख्या 2 लाख 81 हजार 386 वर आली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा सरासरी आकडा कमी सोमवारी (दि. 17) 18.17 वर येऊन पोहोचला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र महाराष्ट्रातही गेल्या महिनाभराच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 34,389 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर असून तामिळनाडूत 33,181 नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 84.81 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशभरात गेल्या 24 तासांत 3 लाख 78 हजार 741 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. तर एकूण 2 कोटी 11 लाख 74 हजार 76 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच पुणे शहरातील संख्याही घटत आहे. गेल्या काही दिवसात पुणे शहरात रुग्ण संख्या 5 हजाराच्या जवळपास पोहचली होती. पण, आता या रुग्ण वाढीतून पुण्याला चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज पुण्यात एकूण रुग्ण 700 आसपास आढळले आहेत.