Coronavirus : कोरोनाची तिसरी लाट थोपवणारच अन् संकटावर विजय निश्चित – डॉ. तात्याराव लहाने

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात थैमान घातलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आपण नियंत्रण मिळवले आहे. त्यानंतर आता येणाऱ्या तिसऱ्या लाटेवर देखील आपण निश्चितच विजय मिळवू, असा ठाम आत्मविश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक आणि कोरोना विरुद्धच्या लढाई साठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केला आहे. तसेच मास्क हा आपल्या कपड्यांबरोबरचा एक अविभाज्य भाग असल्याचे आवर्जून त्यांनी नमूद केले. आपण घरातून बाहेर पडल्यावर शर्ट पँट काढतो का ? नाही ना ? तसेच मास्क हाही आता आपल्या कपड्यांबरोबरचा अविभाज्य भाग झाला आहे. तोंड आणि नाक झाकून योग्य पद्धतीने मास्क वापरला आणि स्वच्छता, अंतर व्यवस्थित राखले तर कोरोनाला थोपविण्यात आपण निश्चितच यशस्वी होऊ असे ते म्हणाले.

बोरीवली पूर्व येथील फेसबुक लाईव्ह वसंत व्याख्यानमालेत शनिवारी (दि. 22) कोरोनाशी लढाई आपण जिंकणारच या विषयावरील दुसरे पुष्प गुंफतांना डॉ. लहाने बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या 2 वर्षात राज्य शासनाने कोरोना विरोधातील युद्ध लढतांना काय काय उपाययोजना कराव्या लागल्या त्याची सविस्तर माहिती दिली. कोरोना जसा भारतात पर्यायाने महाराष्ट्रात आला तेंव्हा वैद्यकीय सुविधा फारच कमी होत्या. मग त्या कशा वाढत गेल्या त्याची माहिती देतांनाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या कार्यक्षमतेने काम करण्याची पद्धत याचा फार मोठा फायदा शासकीय यंत्रणेला झाला. वैद्यकीय आणि शास्त्रीय, वैज्ञानिक या बाबींची सांगड घालून योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. त्यामुळे आपण सर्व आरोग्य यंत्रणा आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांच्या समन्वयाने कोरोनावर नियंत्रण आणल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. लोकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. आपल्याला काहीही होणार नाही, काहीही झालेले नाही, अशा पद्धतीने मानसिकरित्या मजबूत राहणे गरजेचे आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने हलगर्जीपणा योग्य नाही, हे सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक सांगितले. लोकांनी हक्कांबरोबर कर्तव्याचीही जाणीव ठेवणे आवश्यक आहे, हे सांगायला डॉ. लहाने विसरले नाहीत. डॉ. तात्याराव लहाने यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी घेतली.